अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी सर्वांची उत्सुकता वाढायला लागली आहे. ५ ऑगस्ट २०२० रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. जवळपास ४० किलो वजन असलेली चांदीची वीट ठेऊन हे भूमिपूजन केले जाणार आहे. परंतु भूमिपूजनाच्या आधी जमिनीत २००० फूट खोलीवर एक “टाईम कॅप्सुल” ठेवली जाणार आहे. त्यामध्ये राममंदिर आंदोलनाचा सर्व इतिहास असणार आहे. ही जागा राममंदिराच्या मुख्य गर्भगृहाच्या ठिकाणी असणार आहे.
टाईम कॅप्सुल म्हणजे नक्की काय असते ?
टाईम कॅप्सुलच्या नावातच तिचा अर्थ दडला आहे. टाईम कॅप्सुल म्हणजे एक छोटीशी घनाकृती कुपी असते, ज्यात एखादी ऐतिहासिक माहिती किंवा वस्तू जतन करुन ठेवली जाते. एकप्रकारे भविष्यातील शेकडो, हजारो वर्षानंतरच्या पिढ्यांसाठी आताच्या काळातील माहितीचा अहवालच कॅप्सुलमध्ये जतन करुन ठेवलेला असतो. त्यातली माहिती सहसा सार्वजनिक केली जात नाही. ही कॅप्सुल धातूंची बनलेली असून ती वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानाचा सामना करण्यास आणि जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारच्या क्रियेच्या परिणामास तोंड देण्यास सक्षम असते.
भारतात आतापर्यंत या ५ ठिकाणी टाईम कॅप्सुल ठेवण्यात आल्या आहेत
टाईम कॅप्सुलचा उद्देश एखाद्या विशिष्ट समूहाचा, काळाचा किंवा स्थळाचा इतिहास जतन करुन ठेवणे आणि आणि विशिष्ट काळानंतर ती कॅप्सुल बाहेर काढून त्यामध्ये जतन केलेला दुर्मिळ इतिहास पुढच्या पिढीसमोर आणणे हा असतो. आपणास वाचून आश्चर्य वाटेल की राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी गाढली जाणारी टाईम कॅप्सुल ही काय भारतातील पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील ५ वेळा भारतात वेगवेगळ्या ठिकाणी अशी टाईम कॅप्सुल ठेवली गेली आहे.
इंदिराजींनी ८००० खर्चून पुरलेली टाईम कॅप्सुल मोरारजींनी ५८००० घालवून बाहेर काढली
माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी १५ ऑगस्ट १९७२ रोजी दिल्लीच्या लालकिल्ला परिसरात एका दरवाजाबाहेर “कालपत्र” नावाची टाईम कॅप्सुल गाढली होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर २५ वर्षांच्या काळात भारताने काय काय साध्य केले याविषयीची माहिती त्यामध्ये जतन करण्यात आली होती. ही कुपी १००० वर्षानंतर उघडण्याचे ध्येय ठेवण्यात आले होते, परंतु आणीबाणीनंतर इंदिरा गांधी सत्तेवरुन पायउतार झाल्या आणि १९७७ मध्ये जनता पार्टीचे सरकार सत्तेत आले.
त्यावेळी प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांनी ही टाईम कॅप्सुल पुन्हा जमिनीतून वर काढली. १९७२ मध्ये इंदिरा गांधी सरकारला ही टाईम कॅप्सुल गाढायला ८००० रुपये खर्च आला होता, परंतु ती कॅप्सुल बाहेर काढायला मोरारजींच्या सरकारला ५८००० रुपये घालवावे लागले. त्यातली माहिती कधीही सार्वजनिक केली गेली नाही.
भारतात अजून कुठे कुठे गाढली आहे टाईम कॅप्सुल ?
लालकिल्ला परिसराव्यतिरिक्त ६ मार्च २०१० रोजी आयआयटी कानपूर येथे राष्ट्रपतींच्या हस्ते एक टाईम कॅप्सुल गढ्ण्यात आली आहे. २०१० साली गुजरातच्या स्थापनेला ५० वर्ष झाल्याच्या निमित्त त्याचा इतिहास एका टाईम कॅप्सुलमध्ये गांधीनगरच्या महात्मा मंदिर येथे गढ्ण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील अलेक्झांड्रा गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूशनमध्ये एक टाईम कॅप्सुल गढ्ण्यात आली आहे, जी २०६२ साली संस्थेच्या २०० व्या वर्षी बाहेर काढण्यात येणार आहे.
४ जानेवारी २०१९ रोजी जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी याठिकाणी गढ्ण्यात आलेल्या टाईम कॅप्सुलमध्ये स्मार्टफोन, लँडलाईन टेलिफोन, VCR, स्टिरिओ प्लेअर, स्टॉपवॉच, कॉम्पुटर पार्टस, कॅमेरा, विज्ञान पुस्तक आणि शास्त्रीय उपकरणे गाढण्यात आली आहेत, जी १०० वर्षानंतर बाहेर काढली जाणार आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.