शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो आणि सुशिक्षित झालेल्या माणसाचा जातीधर्माच्या अस्मितांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो असे मानले जाते. थोडक्यात शिक्षणाने संकुचित असणाऱ्या माणसांचा दृष्टिकोन व्यापक होतो. शाळेच्या दाखल्यावरून जातीचा उल्लेख काढून टाकावा अशा प्रकारच्या चर्चा देशात घडत असतात.
आरक्षणाच्या माध्यमातूनही सामाजिक किंवा अल्पसंख्यांक आरक्षणावरून वादविवाद आहेत. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील इयत्ता सहावीच्या सीबीएसईच्या परीक्षेत विचारलेल्या दलित आणि मुस्लिमांबद्दलच्या एका प्रश्नाने खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण ?
तामिळनाडूमध्ये सहाव्या इयत्तेच्या सीबीएसईच्या परीक्षा सुरु आहेत. केंद्रीय विद्यालय संघटनेशी (KVS) संबंधित एका शाळेतलया परीक्षेत दलित आणि मुस्लिम यांच्या संदर्भाने प्रत्येकी एक असे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले आहेत.
सोशल मीडियात ही प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात दलित आणि मुस्लिमांबद्दल भेदभाव निर्माण होऊ शकतो असा आरोप करण्यात येत आहे. सीबीएसईकडून हे प्रश्न तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीने तामिळनाडूत जोर पकडला आहे.
काय होते ते प्रश्न ?
सोशल सायन्सच्या पुस्तकातील दुसऱ्या धंद्यावर आधारित असणारे हे प्रश्न “विविधता आणि भेदभाव”वर आधारित होते. केंद्रीय विद्यालय संघटनेने व्हायरल होणारी प्रश्नपत्रिका बनवत असल्याचे सांगितले आहे, तर इंटर्नल एक्झाममध्ये प्रश्न तयार करण्यामध्ये आपली काहीही भूमिका नसते असे सीबीएसईने सांगितले आहे.
पहिला प्रश्न “दलित म्हणजे काय ?” असा असून योग्य उत्तरासाठी “अ) परदेशी ब) अस्पृश्य क) मध्यमवर्ग ड) उच्च वर्ग” असे पर्याय देण्यात आले आहेत.
तर दुसरा प्रश्न “मुस्लिमांविषयी सामान्य रूढी काय आहे?” असा असून योग्य उत्तरासाठी “अ) मुस्लिम आपल्या मुलींना शाळेत पाठवत नाहीत. ब) ते पूर्णपणे शाकाहारी आहेत. क) ते रोजा दरम्यान झोपत नाहीत. ड) वरील सर्व” असे पर्याय देण्यात आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या प्रश्नपत्रिकेची सत्यता अद्याप समोर आली नाही. मात्र झालेल्या प्रकारचा सर्व पक्षांनी निषेध केला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.