विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीला मागील काही काळात अनेक दिग्गज नेत्यांनी रामराम करत भाजप शिवसेनेत प्रवेश केला. या सोडून गेलेल्यांचे काय करायचे ते मी बघतो असा इशाराच पवारांनी नुकताच एका सभेतून दिला.
काल परभणीत सभेत बोलताना ते म्हणाले सबंध देशात मंदीची लाट असून शेतमालाच्या किमती कोसळल्या आहेत. शेतमजुरांच्या हाताला काम नाही. बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत आणि नोकरभरतीची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी वेगळीच भरती सुरू केली, पण काही माणसे गेली तरी त्याची मला चिंता नाही. १९८० साली ५२ आमदार मला सोडून गेले, पण पुढच्या निवडणुकीत त्यातला एकही निवडून आला नाही.
पवार पुढे म्हणाले १९८० च्या निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाचे साठ आमदार निवडून आले होते. त्या वेळी १५ दिवसांसाठी मी परदेशात गेलो असताना काही मंडळींनी सत्तेचे आमिष दाखवून आमदार फोडले होते. मी परतलो तेव्हा माझ्याबरोबर केवळ सहा आमदार होते. १९८५ च्या निवडणुकीत पुन्हा सहाचे साठ आमदार करून दाखविले होते.
जे गेले ते निवडून येणार नाहीत असे पवार म्हणाले. खासरेवर जाणून घेऊया १९८० मध्ये नेमकं असं काय घडलं होतं जेव्हा पवारांनी ६ चे ६० आमदार केले होते.
अन त्यावेळी शरद पवारांना सोडून गेलेले ९० टक्के आमदार घरी बसले!
१९७५−७७ दरम्यान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली. मार्च १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान बनले.
आणीबाणीचा परिणाम काँग्रेसवर देखील मोठ्या प्रमाणात झाला. १९७८ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली आणि यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी काँग्रेस उदयास आली.
१९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदच सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आणि १८ जुलै १९७८ रोजी शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पवार महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले. पण पुढे १९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत जोरदार पुनरागमन झाले आणि त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली.
त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने (इंदिरा) २८८ पैकी १८६ जागा जिंकल्या तर समाजवादी काँग्रेसला फक्त ४७ जागा जिंकता आल्या. बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.
पुढे हे आमदार देखील एक एक करत शरद पवारांची साथ सोडत गेले. शरद पवार त्यावेळी कामानिमित्त लंडन दौऱ्यावर गेले असता आमदारांनी कॉंग्रेस आय मध्ये प्रवेश केला. त्यावेळी फक्त ६ आमदार पवार यांच्यासोबत राहिले. त्यामुळे पवारांचे विरोधी पक्षनेते पद देखील गेले.
शरद पवारांनी त्यानंतर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. गावागावात शरद पवार त्यानंतर पोहचले. याचा फायदा त्यांना पुढील निवडणुकीत होणारच होता. पण १९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली आणि काँग्रेसचे नेतृत्व राजीव गांधी यांच्याकडे आले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसने ४०४ जागा जिंकल्या. समाजवादी काँग्रेसचे फक्त ४ खासदार निवडून आले ज्यात शरद पवार हे देशात दुसऱ्या क्रमांकांच्या मताधिक्याने निवडून आले.
तिथूनच ते राष्ट्रीय राजकारणात आले. त्यानंतर १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी तरुण आणि नवख्या उमेदवारांना संधी दिली आणि ५४ आमदार निवडून आणले होते. शरद पवार यांना १९८० मध्ये सोडून गेलेल्या जवळपास ९० टक्के आमदारांना त्यांनी घरी बसवले. पुढे ते सोडून गेलेले आमदार सभागृहात जास्त दिसलेच नाही.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.