टीम इंडियाचा ऑफस्पिनर आर.अश्विन २१ फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा मैदानावर दिसणार आहे. तो सध्या न्यूझीलंड इलेव्हन विरूद्ध सराव सामना खेळत आहे. दरम्यान आर.अश्विनने कसोटी मालिकेपूर्वी एक मोठा खुलासा केला आहे. क्रिकबझच्या एका विशेष कार्यक्रमात त्याने सांगितले की विरोधी संघातील खेळाडूंनी त्याचे अपहरण केले होते. तसेच त्याची बोटे तोडण्याचीही धमकी दिली होती. चला तर जाणूनन घेऊया नेमके काय आहे हे प्रकरण…
असे झाले होते आर.अश्विनचे अपहरण
आर.अश्विनने क्रिकबझच्या शोमध्ये आपल्या अपहरणाचा घडलेला प्रसंग सांगितला. त्याने सांगितले की १४-१५ वर्षे वय असताना तो आणि त्याचे मित्र टेनिस बॉल टूर्नामेंट खेळत असत. एका स्पर्धेत त्याचा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. फायनल सामना खेळून विजेतेपद मिळवण्यासाठी आर.अश्विन घरातून बाहेर पडत होता, इतक्यात रॉयल एन्फिल्ड बुलेट गाडीवर बसुन ४-५ मुले त्याच्या घरी आली. दिसायला ती एकदम पैलवान वाटत होती. त्यांनी अश्विनला सांगितले की फायनल सामन्यात खेळण्यासाठी आम्ही तुला न्यायला आलो आहे. त्यानंतर ती मुले अश्विनला बाईकवर बसवुन घेऊन गेली. त्यानंतर अश्विनला एका चहाच्या दुकानावर नेण्यात आले आणि त्याच्यासाठी जेवणही मागवण्यात आले. परंतु अश्विनला समजलेच नाही की त्याचे अपहरण झाले आहे.
बोटे तोडण्याची दिली धमकी
सामन्याची वेळ जवळजवळ येत होती. अश्विनने त्या मुलांना सांगितले की आता मला जायला हवं. त्यावर त्या मुलांनी जायला नकार दिला. त्यांनी सांगितले की आम्ही विरोधी संघातील लोक असुन तुला फायनलमध्ये खेळुन न देण्यासाठीच आम्ही तुला उचलुन इकडे आणले आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी अश्विनला धमकी दिली की त्याने जर पळून जायचा प्रयत्न केला तर ते त्याची बोटे तोडून टाकतील.