पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे ४० जवान शहीद झाले होते. जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. भारतीय वायुदलाने या हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैशच्या तळांवर एअर स्ट्राईक केला. त्यामध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले याचा अधिकृत आकडा समोर आलेला नसला तरी जैशचे यामध्ये मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
भारताने केलेल्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणावर विविध देशांनी दहशतवादाविरोधात पाऊल उचलण्यासाठी दबाव टाकला होता. यामध्ये आता इराणने देखील पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना घुसून मारण्याची धमकी दिली आहे. इराणच्या आयआरजीसी फोर्सचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्कराला धमकी दिली आहे.
पाकिस्तानमधून अनेक शेजारील देशांच्या सीमावर्ती भागात दहशतवाद पसरवला जात आहे. इराणने याविरुद्ध आता आवाज उठवला असून थेट धमकीच पाकिस्तानला दिली आहे. इराणच्या संयमाचा अंत पाहू नका अशा शब्दात कासीम सुलेमानी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. पाकिस्तानमधून या संघटना देशभरात दहशतवाद पसरवत असतात. त्यामुळे जगभरात पाकिस्तानच्या विरोधी सूर आहे.
पाकिस्तानने इराणवर होणाऱ्या दहशतवादी कारवायांना खतपाणी घातले, तर इराणही पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानला धडा शिकवेल, असे इराणच्या आयआरजीसी फोर्सचे कमांडर कासीम सुलेमानी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातले तर जातेच पण दहशतवाद्यांचे पुरावे देऊनही कुठलीही कारवाई त्यांच्या विरोधात करत नाही. इराण पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत सुलेमानी यांनी दिले.
पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादाला रोखण्यासाठी इराण पाकिस्तानच्या सीमारेषेवर भींत बांधण्याची योजना देखील आखत आहे. इराणच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख हेशमातोल्लाह फलाहतफिशेह यांनीही पाकिस्तानला दम भरला आहे. तर अली जाफरी यांनीही पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराच दिला आहे. अली जाफरी हे आयआरजीसीचे कमांडर आहेत.
भारत आणि इराणकडून संयुक्तपणे पाकिस्तानातील दहशतवादाचा खात्मा करण्यासंदर्भात चर्चा झडत आहे. त्यासाठी भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले हे इराणच्या दौऱ्यावरही जाणार होते. मात्र, पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईकमुळे गोखले यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यातच, इराणचे कमांडर सोलेमनी यांनी पाकिस्तानला इशारा देत दहशतवादाविरुद्ध भारत-इराण यांच्या घनिष्ट मैत्रीचे संकेत दिले आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.