आपल्या महाराष्ट्रात एक असा समुद्र किनारा आहे ज्याला जागतिक आणि देश स्तरावरील पर्यटकात अत्यंत लोकप्रिय आहे. देशातील १० सुंदर बीच मध्ये त्याची गणना होती. आपण या बीच ला गेला तर परदेशात आहात असाच फील येईल. अजूनही महाराष्ट्रातील लोकांसाठी हा बीच जास्त माहितीचा नाही. तर हा बीच आहे तारकर्ली .समुद्री पर्यटनात तारकर्ली बीचने जागतिक नकाशावर स्थान मिळविले आहे.
कारली नदी अन अरबी समुद्राच्या साथीने जगाला सुंदरतेचा संदेश देणारा हा महाराष्ट्रातील मालवण येथील बीच. निर्मल सुरक्षित किनारा अन शांत लाटा तारकर्लीला एका वेगळ्याच उंचीला घेवून जातो. समुद्र इतका सुंदर आहे कि सूर्य प्रकाशात अगदी 20 फुटापर्यंत समुद्रतळ दिसू शकतो. अश्या स्वर्गीय ठिकाणाला आयुष्यात एकदातरी भेट द्यावीच. किनार्याला लागून असणाऱ्या झोपडीवजा कॉटेजमध्ये राहून निवांतपणे दिवस घालवायला असे ठिकाण क्वचितच मिळेल.
येथील रामनवमी उत्सव असो वा वॉटरस्पोर्ट्स असो सारे काही तुम्हाला एकदम फ्रेश करणारे अन नव्या उमेदीने आयुष्य पुढे नेणारे. पर्यटन विकास महामंडळाने तंबू निवासाची व्यवस्था केली आहे. हाऊसबोट व स्पीड बोटीतून येथे समुद्रात सफर करता येते. मालवणपासून ६ कि.मी. अंतर आहे. येथून ४ कि.मी.वर सुंदर माडा-पोफळीच्या बागांतील ‘देवबाग’ पाहता येते. अरबी समुद्र व कर्ली नदीच्या संगमावरील देवबाग फिरताना फारच सुंदर वाटते.
वाटर स्पोर्ट ची धमाल – Scuba Diving, डॉल्फीनदर्शन व हाऊसबोट इत्यादी
मालवणमध्ये एमटीडीसीने Scuba Diving ची सुविधा उपलब्ध केली आहे. मालवण जेटीजवळ याचे बुकिंग होते. किल्ल्याच्या मागील बाजूला खोल समुद्रातील सौंदर्य पर्यटकांना दाखवले जाते. मालवणमध्ये समुद्रसफर करताना तारकर्ली, देवबाग इथे सायंकाळी डॉल्फीनदर्शन होते; तारकर्लीच्या खाडीत हाऊस बोटिंगचा प्रकल्प एमटीडीसीने सुरू केला आहे. याचे बुकिंग एमटीडीसीच्या तारकर्ली पर्यटन निवास केंद्रात होते.
तारकर्ली पासून जवळच सिंधदुर्ग हा जलदुर्ग आहे. मालवण नजिक भरसमुद्रात “सिंधुदुर्ग” हा जलदुर्ग आजही आपला ऐतिहासिक वारसा जतन करत खंबीरपणे उभा आहे. इ. स. १६६४ मध्ये ‘कुरटे’ नावाने ओळखल्या जाणार्या या बेटावर ४१ एकर क्षेत्रात शिवाजी महाराजांनी किल्ल्याची उभारणी केली.
सागरी आरमाराचे हे तत्कालीन महत्त्वाचे ठिकाण होते. किल्ल्यास ३२ बुरुज आहेत. तटबंदी भक्कम व नागमोडी वळणाची आहे. किल्ल्यात शिवाजी महाराजांचे राज्यातील एकमेव शिवरामेश्र्वर मंदिर आहे. तसेच महाराजांच्या हाता-पायाचे ठसे जतन करुन ठेवण्यात आले आहेत.
मुंबई येथून ५१० किलोमीटर अंतरावर मालवण हे जवळचे शहर येथे तिथून ८ किलोमीटर वर तारकर्ली हा बीच येतो. जवळचे विमानतळ गोवा येथील दाबोलीम आहे तर आपण रेल्वेने कुडाळ स्टेशन येथे आला तर तिथून ५० किलोमीटर वर मालवण आहे. आपल्याला कणकवली या स्टेशनवरून पण येता येईल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…