नेहरू-गांधी घराण्याला बदनाम करण्यासाठी जे अनेक प्रयत्न केले जातात त्यातील एक म्हणजे इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी हे मुस्लिम होते आणि त्यांचे आडनाव खान होते असा दावा केला जातो. लोकांना साधे सरळ सत्य पचवण्यापेक्षा गूढ दंतकथा आवडतात. त्यामुळेच त्यांचा यावर चटकन विश्वास बसतो. वास्तविक पाहता फिरोज गांधी किंवा नेहरू-गांधी घराणे मुस्लिम असते तरीही यात गैर काहीच नाही. पण मुस्लिमद्वेषी वृत्तीच्या लोकांना हा मुद्दा म्हणजे न जाणे कोण विकृत आनंद देऊन जातो.
कोण होते फिरोज गांधी?
फिरोज जहांगीर गांधी ( सप्टेंबर १२, १९१२ – सप्टेंबर ८, १९६०) हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार व राजकारणी आणि एक प्रखर भ्रष्टाचारविरोधक होते. फिरोज गांधी हे दिल्लीतील नॅशनल हॅराल्ड व लखनौतील नवजीवन या दैनिकांचे प्रकाशक होते. ते राज्यसभेचे सदस्य होते आणि त्यांनी सभागृहात नेहरूंच्या राजकारणाचा आणि राज्यकारभाराचा सतत विरोध केला.
फिरोज गांधी हे भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पती आणि संजय आणि राजीव गांधी यांचे पिता होते.
फिरोज गांधींचा जन्म जुन्या बॉम्बे फोर्टमधल्या तेहमूलजी नरिमन हॉस्पिटलमध्ये एका पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या वडीलांचे नाव फरेदून जहांगीर घांदे (Ghandy) आणि आईचे नाव रतीमाई (माहेरचे आडनाव कोमीसरीएट Commissariat, त्यांच्या घराण्याचा ब्रिटिश सैन्याला रेशन पुरविण्याचा व्यवसाय होता त्यावरून हे आडनाव पडले) होते. (टीप: जुन्या पारशी घराण्यांमधील लोक जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना आडनावे नव्हतीच. म्हणून त्यांना परत आडनावे दिली गेली, आजही ती व्यवसायांवरून दिसतात, उदा. लोखंडवाला, दारुवाला) त्यांचे कुटुंब मुंबईत खेतवाडी मोहल्ल्यात नौरोजी नाटकवाला भवन इथे राहत असे. त्यांचे वडील Killick Nixon या कंपनीत मरीन इंजिनिअरची नोकरी करत असत.
त्यांना पुढे वॉरंट इंजिनिअर म्हणून बढती मिळाली. फिरोज एकूण पाच भावंडांपैकी शेंडेफळ होते. त्यांना दोराब व फरीदून जहांगीर नावाचे दोन मोठे भाऊ आणि तेहमीना केर्षाष्प व अलू दस्तुर नावाच्या दोन थोरल्या बहिणी होत्या. दक्षिण गुजरातमधल्या भडोच येथील वाडवडिलांच्या घरातून ते कामधंद्यानिमित्त मुंबईला स्थलांतरित झाले होते. त्यांच्या आजोबांचे वडिलोपार्जित घर आजही कोटपारीवाड येथे आहे.
१९२०च्या दशकाच्या सुरुवातीला वडिलांच्या अकाली झालेल्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब अहलाबादला स्थलांतरित झाले. त्यांच्या सोबत त्यांची अविवाहित मावशी डॉ शिरीन कोमीसरीएट या देखील होत्या. त्या तत्कालीन सिंध प्रांतात कराचीमध्ये Lady Dufferin Hospital येथे शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत होत्या. तिथे त्यांचे माध्यमिक शिक्षण विद्यामंदिर हायस्कुलमध्ये झाले व पुढे त्यांनी ब्रिटिश स्टाफ असलेल्या एविंग ख्रिश्चन कॉलेजमधून पदवी घेतली.
१९३०मध्ये काँग्रेसने स्वातंत्र्य सैनिकांचे वानर सेना या नावाने कृतीदल उभारले होते. कमला नेहरू (नेहरूंची सुविद्य पत्नी) आणि इंदिरा गांधी यांची फ़िरोजसोबत पहिली भेट याच एविंग कॉलेजच्या बाहेर वानर सेना निदर्शने करताना झाली. त्यादिवशी कमला नेहरूंना उन्हामुळे चक्कर आली. फिरोज गांधी त्यांच्या मदतीला धावले. इंदिरा आणि कमला नेहरूंसोबत झालेल्या चर्चेचा परिणाम म्हणून दुसऱ्याच दिवशी कॉलेज शिक्षण सोडून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी मारली.
महात्मा गांधींच्या आडनावावरून प्रेरणा घेऊन त्यांनी आपले आडनाव बदलून घांदे(Ghandy) वरून गांधी (Gandhi) असे केले. १९३०मध्ये त्यांना लालबहादूर शास्त्री (तत्कालीन अहलाबाद जिल्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष) यांच्या समवेत ९ महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली गेली. त्यांना शास्त्रीजींसोबत फैजाबाद जेलमध्ये डांबण्यात आले. सुटका झाल्याबरोबर त्यांनी तत्कालीन संयुक्त प्रांतात (आजचा उत्तर प्रदेश) शेती भाडेपट्टा माफ करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. १९३२ व ३३ मध्ये त्यांना आणखीन दोनवेळा कारावास भोगावा लागला, त्यावेळी ते नेहरूंचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात.
फिरोजनी इंदिरा गांधींना पहिल्यांदा १९३३ मध्ये लग्नासाठी मागणी घातली तेव्हा त्या अवघ्या १६ वर्षांच्या होत्या, म्हणून त्यांनी फिरोजना नकार दिला. त्यातच कमला नेहरू क्षयाने आजारी पडल्या, त्यांची सेवा करण्याच्या निमित्ताने फिरोज यांची नेहरू कुटुंबियांसोबत जवळीक हळूहळू वाढत गेली. कमला नेहरूंना उपचारासाठी युरोपात नेण्याची तजवीज करणे, त्यांची काळजी घेण्यापर्यंत आणि मृत्यसमयी त्यांच्या शय्येजवळ असण्यापर्यंत फिरोज गांधींनी कमला नेहरूंची खूप सेवा केली. याचा परिणाम म्हणून इंदिरांशी त्यांची भावनिक जवळीक वाढली आणि या जोडप्याने १९४२मध्ये हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलं.
त्यांच्या या लग्नाला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विरोध केला, अगदी गांधीजींना मध्यस्थी करायला सांगितले. पण शेवटी हे लग्न झालेच. लग्न झाल्यावर अल्पावधीतच या जोडप्याला चले जाव आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल अहलाबाद येथील नैनी मध्यवर्ती कारागृहात कारावास भोगावा लागला. त्यांनंतरची चार-पाच वर्षे काहीशी सुखद व कौटुंबिक स्वास्थ्याची म्हणावी अशी होती. याचदरम्यान १९४४ला राजीव आणि १९४६ला संजीव यांचा जन्म झाला.
स्वातंत्र्यानंतर ते इतर अनेक काँग्रेसच्या नेत्यांसोबत अस्थायी सरकारमध्ये १९५०-५२मध्ये सहभागी होते. याचवेळी ते नॅशनल हेराल्ड या दैनिकाचे व्यवस्थापकीय संचालक बनले. १९५२मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत ते रायबरेली मतदारसंघात निवडून आले व संसद सदस्य बनले. इंदिरा गांधींनी त्यावेळी दिल्लीहून येऊन त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. या सोबतच ते नेहरूंचे कडवे टीकाकार आणि भ्रष्टाचार विरोधी भूमिका घेण्यासाठी ओळखले जाऊ लागले.
स्वातंत्र्यानंतर अनेक उद्योग घराण्यांची राजकीय नेत्यांशी जवळीक वाढली यातून अनेक आर्थिक गैरव्यवहार होत होते. १९५५मध्ये रामकृष्ण दालमिया या बँक व विमा कंपनी संचालकाने Bennett and Coleman ही कंपनी ताब्यात घेताना निधी स्वतःच्या खाजगी खात्यात वळता केल्याचा भ्रष्टाचार फिरोज गांधींनी उघडकीस आणला.
१९५७मध्ये ते पुन्हा एकदा रायबरेली येथून निवडून आले. १९५८मध्ये एलआयसीमधल्या हरिदास मुंढ्रा घोटाळ्याचा मुद्दा त्यांनी संसदेत लावून धरला. यावरून नेहरू सरकारची स्वच्छ प्रतिमा डागाळली. अर्थमंत्री टी टी कृष्णामचारी यांना याप्रकरणी राजीनामा देण्याची नामुष्कीची वेळ आली. यावरून इंदिरा गांधी आणि त्यांच्यात काही बेबनाव झाला आणि माध्यमांना चर्वण करायला मुद्दा सापडला.
फिरोज गांधी राष्ट्रीयकरणाचे कडवे पुरस्कर्ते होते. एलआयसी आणि टेल्को सारख्या कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करण्याचा त्यांचा आग्रह होता. टेल्को टाटांच्या मालकीची होती आणि टाटासुद्धा पारशी होते त्यामुळे फिरोज गांधींना पारशी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. अश्याप्रकारे प्रामाणिक नेते असणारे फिरोज गांधी त्यांच्या राजकीय विरोधकांनासुद्धा अत्यंत आदरणीय होते.
१९५८ मध्ये फिरोज गांधींना पहिला हार्ट ऍटॅक आला. त्यावेळी इंदिरा गांधी त्रिमूर्ती हाऊस या पंतप्रधान निवासात त्यांच्या वडिलांजवळ राहत असत. त्यावेळी त्या भूतानच्या दौऱ्यावर होत्या. ही बातमी कळल्यावर दौरा अर्धवट सोडून त्या भारतात परतल्या आणि फिरोजना काश्मीरमध्ये विश्रांती व हवापालटासाठी घेऊन गेल्या.
१९६०मध्ये दुसरा हार्ट ऍटॅक आल्याने विलिंग्डन हॉस्पिटल दिल्ली येथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे अंत्यसंस्कार अहलाबादमधील पारशी समाज स्मशानभूमीत झाले. अश्यारितीने भारतीय राजकारणातील एक महत्वाचा दुवा निखळला.
आज देशाच्या पंतप्रधान पदी एक गुजराती व्यक्ती आहे. मोदींना श्याम प्रसाद मुखर्जी यांचा जन्म आणि मृत्यू कधी झाला? किंवा वल्लभभाई पटेल यांच्या अंत्यविधीला नेहरू उपस्थित होते, या इतिहासाचे मूलभूत ज्ञान नाही. अर्थात संघाच्या शाखेत शिकवल्या जाणाऱ्या इतिहासावर विश्वास ठेवणाऱ्या संघोट्यांचे इतिहासाचे आकलन याहून अधिक असणे शक्य नाही.
सुब्रमण्यम स्वामी यांनी फिरोज गांधी व इंदिरा गांधींच्या वैचारिक संघर्षाला विकृतपणे रंगवून इंदिरा गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न फसल्यावर फिरोज गांधींचे आडनाव खान होते असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. बहुसंख्य जनतेला आजही फिरोज गांधी अज्ञात असल्यानेच आजचा हा लेखन प्रपंच. फिरोज गांधींचे घराणे मूळचे गुजरातचे या नात्याने राहुल गांधी देखील गुजरातचे सुपुत्र ठरतात. तरीही आजच्या गुजरात निवडणुकीत याचे भांडवल करणे त्यांनी टाळले आहे. यातच काँग्रेसच्या विचारसरणीतून आलेल्या विनम्रता आणि साधेपणा या गुणांचा परिचय होतो. स्वतः कधीकाळी विकलेल्या (की न विकलेल्या?) चहाचे भांडवल करणाऱ्या मोदींसमोर राहुल गांधी या गुणांमुळेच श्रेष्ठ ठरतात.
© अभिषेक माळी
9665320860