आज पाच राज्यांचे निवडणुकीचे निकाल लागले आहेत. अजूनही मतमोजणी चालू असून अनेक जागेवरचे निकाल येणे बाकी आहे. छत्तीसगढ आणि राजस्थान मध्ये काँग्रेसने भाजपाकडील सत्ता बहुमतासह खेचून आणली आहे. तर मध्ये प्रदेश मधेही काँग्रेस विजयाच्या जवळ जाऊन पोहचला आहे. पण मध्ये प्रदेशातील अनेक ठिकाणी कांटे कि टक्कर चालू आहे.
मध्ये प्रदेशातील १०-१२ जागांवर अगदी थोड्या मताच्या फरकाने भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार मागे पुढे आहेत. निकालातून काही उमेदवारांचा अगदी थोडक्यात पराभव होणार हे निश्चित झाले आहे. निसटता पराभव या उमेदवारांच्या जिव्हारी लागणार आहे.
असाच काहीसा निसटता पराभव मागच्या वेळी राजस्थान मध्ये काँग्रेसच्या सीपी जोशींना बघावा लागला होता. २००८ मध्ये राजस्थान मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सीपी जोशी हे केवळ एक मताने पराभूत झाले होते. सीपी जोशी हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. त्यानी भिलवाडा मतदारसंघातून खासदारकी देखील भूषवली आहे.
सीपी जोशी हे ४ वेळा आमदारही राहिले होते. पण २००८ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ एका मताने भाजपच्या कल्याण सिंह यांनी सीपी जोशींना पराभूत केलं होतं. कल्याण सिंह यांना त्यावेळी ६२ हजार २१६ मतं पडली होती, तर जोशींनी तेव्हा ६२ हजार २१५ मतं मिळवली होती.
त्यामुळे मागील वेळच्या एक मताने पराभवाने यावेळी त्यांचा निकाल काय लागणार याची उत्सुकता होती. सीपी जोशी यावेळी मात्र आमदारपदी निवडून आले आहेत. ११ वर्षांनी भाजपमध्ये परतलेल्या महेश प्रताप सिंह यांचं जोशींसमोर तगडं आव्हान होतं. तसेच इतरही आठ उमेदवारांचं आव्हान होतं.
यावेळी सीपी जोशी हे १० हजार ४३९ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या मतदारसंघात ७५.०५% मतदान झालं होतं. एक मताने पडलेल्या जोशींना यावेळी मात्र मतदारांनी दिलासा दिला आहे.