दिवाळीच्या मुहूर्तावर टाटा ट्रस्टकडून कॅन्सरच्या पेशंट ना एक गिफ्ट देण्यात आलं आहे. आसाम, झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यात कॅन्सरच्या पेशंटना चांगली सुविधा मिळावी यासाठी नवीन हॉस्पिटलची निर्मिती करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यात प्रत्येक कॅन्सरच्या पेशंटला चांगली सुविधा पोहोचवण्यात येणार आहे, विशेष बाब म्हणजे या सर्व प्रकल्पावर रतन टाटा हे स्वतः देखरेख ठेवणार आहेत.
टाटा ट्रस्ट ने रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला मदत म्हणून या पाच राज्यात कॅन्सरच्या पेशंटवर उपचार व अन्य संसाधन विकसित करण्यासाठी 1000 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे हजारो कॅन्सर पेशंटना उपचारासाठी फायदा होणार आहे. या सर्व हॉस्पिटलची निर्मिती परळच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलवर आधारित असणार आहे. या सर्व हॉस्पिटलमध्ये अत्यंत अद्यावत सुविधा पेशंटना पुरवण्यात येणार आहेत. अजुन एक विशेष बाब म्हणजे या नवीन हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि इतर मेडिकल कर्मचाऱ्यांना टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
देशातील आघाडीचे कॅन्सरवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्येही रुग्णांना 60% पर्यंत रुग्णांना उपचार मोफत किंवा खूप मोठी सूट देऊन केले जातात. पण वाढत्या रुग्णांमुळे या हॉस्पिटलमध्ये उपचार खूप जास्त प्रतीक्षा करावी लागते. यामुळे सामान्य कुटुंबातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो, त्यांना जास्त पैसे मोजून मुंबईसारख्या शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे ही शक्य नसते. बरेच रुग्ण उपचार अर्धवट सोडून जातात. नवीन रुग्णालयामूळे या सर्व समस्यांवर तोडगा निघेल.
आसामचे आरोग्य मंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी 12 ऑक्टोबर रोजी ट्विट करून सांगितले की, ‘रतन टाटा आणि टाटा ट्रस्टच्या सदस्यांना भेटून खूप आनंद झाला, टाटा ट्रस्ट आणि आसाम सरकारच्या परस्पर सहयोगाने कॅन्सरच्या रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरवण्यासाठी काम करण्यात येणार आहे.’
या हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी तेथील राज्य सरकार जास्त खर्च उचलेल. वाराणसीमध्ये सध्या अस्तित्वात असलेले भारतीय रेल्वेचे कॅन्सर संस्था आणि संशोधन केंद्र अद्ययावत करण्यात येणार आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या एका वरीष्ठ डॉक्टरांनी माहिती दिली की, उत्तर भारतातील रुग्णांना या नवीन किंवा सुधारित केंद्रामुळे उपचारासाठी मुंबईसारख्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही.
केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या मते, सर्वाना परवडतील असे उपचार उपलब्ध करण्यासाठी पूर्ण देशभरात अशा प्रकारच्या अनेक हॉस्पिटलची निर्मिती करण्याची इच्छा रतन टाटा यांनी व्यक्त केली आहे.
टाटा ट्रस्टने आसाम सरकार सोबत करारही केला आहे, ज्यामध्ये गुवाहाटी मधील मुख्य कॅन्सर उपचार केंद्रात सुधारणा करण्यात येणार असून, इतर जिल्ह्यातही या सुविधा वाढवण्यात येणार आहेत. तीन टप्प्यात 540 कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात येणार आहेत.
वाचा: जगभरात या प्रॉडक्ट्सवर बंदी, मात्र भारतीय बाजारात होत आहे खुलेआम विक्री