आपण बघितले असेल की मतदार ओळखपत्र असो, पॅनकार्ड असो किंवा आधारकार्ड असो; सर्वांसाठीच ही कागदपत्रं महत्वाची असतात. केवळ सरकारी ओळखपत्र म्हणूनच नाही, तर या कागदपत्रांशिवाय कुठलीही महत्वाची कामं होत नाहीत यादृष्टीनेही या कागदपत्रांचे व्यक्तीच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. पण घरात एखाद्याचे निधन झाले तर त्या व्यक्तीच्या मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड आणि आधारकार्ड यांचे काय करतात यांच्याबद्दलची महत्वपूर्ण माहिती सहसा आपल्याकडे नसते.
वास्तविक पाहता या तिन्ही कागदपत्रांना सरकारी ओळखपत्र म्हणून मान्यता दिली जाते. खासकरुन आधारकार्डला तर सर्वच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आले आहे. तर पॅनकार्ड हे बँक किंवा संबंधित व्यवहारांसाठी अतिशय महत्वाचे कागदपत्र मानले जाते. मतदार ओळखपत्राची गरज आपल्याला लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर निवडणुकांसाठी लागते. कुटुंबात एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर या कागदपत्रांचे काय होते किंवा काय करायला पाहिजे हे आपण पाहणार आहोत.
१) मतदार ओळखपत्र : मतदार ओळखपात्राला मतदान प्रक्रियेसोबतच एक ओळखीचा पुरावा म्हणूनही ग्राह्य धरले जाते. जर मतदार ओळखपत्र असणाऱ्या एखाद्या व्यक्तीचे निधन झाले, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीने निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन निधन झालेल्या व्यक्तीचे ओळखपत्र रद्द करुन घेतले पाहिजे. त्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म भरल्यानंतर त्याच्या सोबत निधन झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला आणि त्याचे मतदार ओळखपत्रही जोडावे लागते.
२) पॅन कार्ड : पॅन कार्ड हे व्यक्तीच्या बँक खात्याशी जोडलेले असते. जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले, तर त्या कुटुंबातील कुठल्याही इतर व्यक्तीने इन्कम टॅक्स विभागाशी संपर्क करुन पॅनकार्ड जमा केले पाहिजे. पॅनकार्ड जमा करण्यापूर्वी या गोष्टीची खात्री केली पाहिजे की त्या पॅनकार्डशी निगडित असणारी सर्व खाती आधी बंद करण्यात आलेली असावीत. तुमच्या कुटुंबात कुणाचे निधन झाले तर तुम्ही न विसरता हे काम करा.
३) आधारकार्ड : तसं पाहायला गेलं तर आधारकार्ड रद्द करण्याची कुठलीय प्रक्रिया नसते. परंतु तज्ञांच्या मते कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्या कुटुंबातील इतर व्यक्तीकनही जबाबदारी असते की मृत व्यक्तीच्या आधारकार्डचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे. आधारकार्ड संबंधित ऑथॉरिटीने व्यक्तीच्या निधनानंतर त्याचे आधारकार्ड रद्द करण्यासंदर्भात कुठले नियम सांगितलेले नाहीत. आधारकार्डधारकाची ओळख त्यांच्या डेटाबेसमध्ये कायमस्वरुपी सेव्ह करुन ठेवली जाते. पण व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे आधारकार्ड वापरणे योग्य नाही.