महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. उद्या २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. २४ ऑक्टोबरला निकाल लागून महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या ताब्यात जाईल याचे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान महाराष्ट्राच्या निवडणुकांचा कार्यक्रम लागू झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. प्रचार सभांमधून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. देशपातळीवरच्या नेत्यांनी महाराष्ट्रात हजेरी लावली. निवडणुकीच्या चर्चा अगदी गावच्या पारांवर रंगल्या. त्यापैकीच विधानसभा निवडणुकीत ज्या मुद्द्यांची चर्चा सर्वाधिक रंगली, असे काही मुद्दे आम्ही आमच्या वाचकांसाठी देत आहोत…
१) पक्षांतर : लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने अनपेक्षित आणि प्रचंड यश मिळवल्यानंतर महाराष्ट्रातही त्याचे परिणाम दिसले. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या पक्षांतील अनेक नेत्यांनी भाजप, शिवसेना पक्षात पक्षांतर केले. जनतेचा विकास करायचा आहे म्हणत अनेकांनी पक्षांतर केले.
२) दिग्गजांच्या तिकिटाला कात्री : एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या नेत्यांनी महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढवला. पण निवडणुकीत त्यांचेच तिकीट कापण्यात आले. एवढेच नाही अनेक विद्यमान आमदारांची तिकिटेही कापण्यात आली. परंतु आपल्यावर संघाचे संस्कार आहेत म्हणत सगळ्यांनी आपापली तलवार म्यान केली.
३) ED नोटीस आणि अजितदादांच्या राजीनामा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या तथाकथित घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांची ED चौकशी करणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर राजकीय वातावरण तापले. शरद पवारांनी आपण स्वःच ED च्या चौकशीला हजर राहणार असल्याचे सांगून ED लाच अडचणीत टाकले. चक्क ED कार्यालयाला पोलिस संरक्षण घ्यावे लागले. परंतु पोलिसांच्या विनंतीनंतर पवारांनी जाणे स्थगित केले. त्याच संध्याकाळी अजितदादांनी आमदारकीचा राजीनामा दिला. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विरोधक राजकीय सुडापोटी शरद पवारांना यात गोवत असल्याचा आरोप करुन त्यांनी विरोधकांना धारेवर धरले.
४) प्रचाराचे मुद्दे : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने दहा रुपयात तर भाजपने पाच रुपयात पोटभर जेवण देण्याचे आश्वासन दिले आहे. एका महिला उमेदवाराने तर चक्क दारुबंदी हटवण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी गुजरात, उत्तरप्रदेशचे नेते येऊन जम्मू काश्मीरमधील ३७० कलमाच्या आधारे मते मागत आहेत.
५) तेल लावलेला फडणवीस पैलवान : देवेंद्र फडणवीस यांनी मी तेल लावलेला पैलवान आहे म्हणत विरोधकांकडे पैलवानच दिसत नाही म्हणत शरद पवारांना आव्हान दिले होते. शरद पवारांनीही कुस्ती पैलवानांसोबत खेळायची असते (हातवारे करुन) याच्याशी नाही, असे म्हणत फडणवीसांच्या आव्हानाची हवाच काढून घेतली.
६) चंपा : पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघात भाजपने चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली. त्यावरुन बरेच नाट्य घडले. चंद्रकांत पाटलांनी “बारामतीकरांना माझा फटका माहित नाही” अशी खोचक टीका केल्यानंतर अजित पवारांनी “चंपाला तर काय कळतच नाही” असे म्हणत चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला.
७) काँग्रेस राष्ट्रवादी विलीनीकरणाचे भाकीत : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आघाडीचे नेते आता ठाकले आहेत, त्यामुळे भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे विलीनीकरण होईल असे भाकीत वर्तवले. परंतु शरद पवारांनी आपण म्हातारे झालो नाही असे सांगत विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
८) नारायण राणेंचा स्वाभिमान : नारायण राणेंनी स्वाभिमान पक्षाची स्थापना करुन एक वर्षही झाले नसताना यांनी आपला पक्षच भाजपमध्ये विलीन केला. आरएसएस आणि फडणवीसांवर घणाघाती टीका करणारे नितेश राणे चक्क भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणि ते चक्क संघाच्या कार्यक्रमाला जाऊन बसले.
९) साताऱ्यात पाऊस आणि पवार : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात खासदार उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करुन शरद पवारांना जोरदार धक्का दिला. परंतु सातारा लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोध पवारांनी आपले लहानपासूनचे मित्र श्रीनिवास पाटलांना उमेदवारी देऊन उदयनराजेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. सातारच्या प्रचारसभेत पडत्या पावसात शरद पवारांनी ज्या पद्धतीने सभा घेतली त्यामुळे महाराष्ट्रभरातून केवळ समर्थकच नाही, विरोधकांनीही पवारांच्या जिद्दीचं कौतुक केले.
१०) धनंजय मुंडेंवर गुन्हा : परळीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील अतिशय अटीतटीची लढत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंकजा मुंडे स्टेजवरच चक्कर येऊन पडल्या. दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या एका सभेतील व्हिडीओ एडिट करुन “बहिणीबद्दल किती खालची भाषा वापरत आहेत” असे सांगून क्लिप व्हायरल करण्यात आली. या क्लिपवरुन धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल झाला. परंतु संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यास त्यांनी ते शब्द कार्यकर्त्याना उद्देशून म्हटले असल्याचे लक्षात येते. मात्र निवडणुकीच्या शेवटच्या काळात अशा चुकीच्या कृत्यामुळे परळीमध्ये गालबोट लागले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.