महाराष्ट्रात येत्या २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होईल. निवडणूक जस जशी जवळ येत आहे तसं तिच्यामध्ये रंगत वाढत जात आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी ३२३९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. निवडणुका म्हणलं कि खर्च आलाच. निवडणुकांमध्ये भरमसाठ पैसे खर्च होतात.
अधिकृतपणे जेवढा पैसे खर्च होतात त्याच्या किती तरी पटीने खर्च हा निवडणुकीदरम्यान होत असतो. विधानसभेसाठी प्रत्येक उमेदवाराला अधिकृतपणे २८ लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे.
निवडणूक आयोग खर्चावर मर्यादा आणतो. पण उमेदवार त्यातून पळवाटा काढतात आणि त्यांना करायचा तेवढा खर्च करतातच. निवडणूक काळात कोट्यवधी रुपये पकडले जातात. आमदार होण्यासाठी किमान २ कोटी तरी खर्च करावा लागतो अशी चर्चा नागरिकांमध्ये असते. पण २ कोटींचा आकडा अनेक ठिकाणी १० कोटींवर जातो.
राजकीय पक्षांना मात्र खर्च करायला कसलेही बंधन नसते. उमेदवारांना त्यांचा खर्च त्यांच्या विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यावा लागतो तर राजकीय पक्षांना त्यांचा खर्च केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे सादर करावा लागतो. त्यामुळेच राजकीय पक्षांचे विमान प्रवास, मोठ्या नेत्यांच्या व्यासपीठासाठीची स्टेज व्यवस्था, ध्वनी व्यवस्था यासाठीचे खर्च उमेदवारांकडे न लावता ते खर्च पक्षाच्या खात्यात जातात.
या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या वतीने जवळपास १७ ते १९ हेलिकॉप्टर आणि १३ ते १४ विमाने वापरली जाणार आहेत. एका व्हीआयपी हेलिकॉप्टरचा खर्च दोन कोटींच्या आसपास येतो तर विमानाचा खर्च अडीच कोटीच्या घरात जातो. हा हिशोब पाहिला तर या हवाई प्रवासावर ५० कोटी रुपये खर्च होणार आहेत.
तसेच प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या, त्यांचं भाडं, पेट्रोल, डिझेल याच्या खर्चाचा तर हिशोबच नाही. या निवडणुकीत अवघ्या १५ दिवसात हिशेबी खर्च हा जवळपास ९०६ कोटी ९२ लाख रुपये आहे. तर बेहिशेबी खर्च हा प्रत्येक उमेदवाराचा १ कोटी जरी पकडला तरी सुमारे ४ हजार कोटीच्या घरात जातो.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.