महाराष्ट्राची २०१९ ची विधानसभा निवडणूक गाजत आहे ती नेत्यांच्या होणाऱ्या पक्षांतरामुळे ! मग कुठल्या नेत्याला जनतेचा विकास करायचा आहे तर कुठल्या नेत्याला अन्याय दूर करायचा आहे. कुणाला आपल्यावरील कारवाई टाळायची आहे तर कुणाला सत्तेची चातक लागली लागली आहे. या सगळ्या नेत्यांना माध्यमातून “आयाराम-गयाराम” नेते म्हणले जात आहे. पण पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना “आयाराम-गयाराम” म्हणण्यामागे काय तर्क आहे. यामागे एक मजेशीर कहाणी आहे. चला तर आज जाणून घेऊया राजकारणातील एक मजेशीर बाब…
पक्षांतरबंदी कायदा कसा जन्माला आला ?
मुळात आपल्या देशात राज्यघटना लागू झाल्यापासून १९६७ पर्यंत काँग्रेसच्या धोरणांना कंटाळुन किंवा काँग्रेसच्या सत्तेत सहभागी होण्यासाठी जवळपास चारशेच्या आसपास नेत्यांनी पक्षांतरे केली होती. नेत्यांच्या या पक्षांतराला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने यंशवंतराव चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली १८ जणांची “पक्षत्यागावरील अभ्यास समिती” नेमून पक्षांतराच्या समस्येवर प्रतिबंधात्मक उपाय सुचवायला सांगितले होते.
या समितीने जानेवारी १९६९ मध्ये आपल्या शिफारस अहवाल सादर केला. पुढे १९७३ पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधीला अपात्र ठरवण्यासंबंधी विधेयक दाखल करण्यात आले. पण १९७७ मध्ये संसद बरखास्त झाली आणि हे विधेयक बारगळले. शेवटी १९८५ मध्ये पक्षांतरबंदी कायदा संमत झाला.
९ तासात चार वेळा पक्ष बदलणारा हा नेता आहे “आयाराम-गयाराम” शब्दामागचा चेहरा
हरियाणाच्या हसनपूर मतदारसंघातील आमदार “गया लाल” आहेत पक्षांतराचा ब्रँड अँबेसिडर ! गया लाल यांनी १९६७ मध्ये केवळ ९ तासात चार वेळा पक्ष बदलला होता. पहाटे काँग्रेसमध्ये असणाऱ्या गया लाल यांनी सकाळी युनायटेड फ्रंटमध्ये,
दुपारी परत काँग्रेसमध्ये आणि संध्याकाळी परत एकदा युनायटेड फ्रंटमध्ये पक्षांतर करुन देशात एका “आयाराम-गयाराम” या नव्या वाक्यप्रचाराला जन्म दिला. सकाळी काँग्रेस सोडून युनायटेड फ्रंटमध्ये गेलेले गया लाल दुपारी काँग्रेसमध्ये पार्ट आल्यानंतर काँग्रेसच्या बिरेंद्र सिंग यांनी “गया राम अब आया राम हो गये है” असे उदगार काढले होते.
यशवंतराव चव्हाणांनी राजकारणात रूढ केला “आयाराम-गयाराम” वाक्प्रचार
पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना “आयाराम-गयाराम” हा वाक्प्रचार वापरण्याचे श्रेय यशवंतराव चव्हाणांना जाते. १९६७ मध्ये संसदेत एका पक्षांतराच्या घटनेचे वर्णन करताना हा वाक्प्रचार वापरुन यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, “आपल्या देशात आयाराम-गयारामांची संख्या वाढत चालली आहे.
” तेव्हापासून पक्षांतर करणाऱ्या राजकीय नेत्यांना “आयाराम-गयाराम” हा शब्दप्रयोग देशभरात रूढ झाला. ज्येष्ठ पत्रकार हरिवंश यांच्या “झारखंड : सपने और यथार्थ” या पुस्तकात या घटनांचा उल्लेख पाहायला मिळतो.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.