महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक दिवसांनंतर मौन सोडले असून आपल्या पक्षाचे दोन उमेदवार जाहीर केले आहे. वांद्रे येथे आयोजित मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे उतरणार की नाही याबाबत अस्पष्ट चित्र होते. मात्र आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण निवडणूक लढणार आणि जिंकणारही असा विश्वास व्यक्त केला.
मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपला पक्ष विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. पक्षाची येत्या ५ ऑक्टोबरला पहिली प्रचार सभा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. प्रचाराचा नारळ कुठून फोडणार हे अद्याप राज ठाकरे यांनी जाहीर केलेले नाही.
मनसे निवडणूक लढविणार असल्याने त्यांच्या प्रचाराचा रोख नेमक्या कोणत्या दिशेने असणार, पुन्हा ते भाजपलाच ठोकणार की त्यांच्या निशाण्यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीही असणार याविषयी मात्र सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे.
शेतकऱ्याच्या मुलाला जाहीर मनसेची पहिली उमेदवारी
मंत्रालयात आत्महत्या करणारे धर्मा पाटील यांचे सुपूत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत प्रवेश केला असून मनसेकडून हे ‘नरेंद्र’ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. तसेच नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर हे सुद्धा मनसेत दाखल झाले असून त्यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला होता. खासकरुन मोदी आणि अमित शाह यांना हटवा अशी भूमिका घेतली होती. त्यांचं ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्यही चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. मनसे १०० जागा लढवणार अशी माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. मात्र त्याबाबत राज ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com इमेल आयडी वर पाठवू शकता.