सांगली कोल्हापूरमध्ये महापुराने थैमान घातलं आहे. या महापुरास कारण आहे कर्नाटकातील अलमट्टी धरण. अलमट्टी धरणाची साठवण क्षमता 123 टीएमसी आहे,28 जुलै ला अलमट्टी धरण जवळपास भरलं होत,जेव्हा धरणाची साठवण क्षमता समाप्त होते,तेव्हा पाण्याचा विसर्ग नदीत क्रमाक्रमाने केला जातो. जेणे करून धरणाच्या बॅकवॉटर मुळे नदीच्या वरील भागात पूर येऊ नये हाच मुख्य उद्देश असतो.पण त्यानंतर पाण्याचा विसर्ग झाला नाही.
सांगली कोल्हापूर सातारा जिल्हा आलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरचा भाग बनला आहे. ह्या भागात जरासा पाऊस जास्त पडला, थोडी पुरपरिस्थीती निर्माण झाली आणि आलमट्टी धरणाने पुढे योग्य विसर्ग नाही केला की ह्या तीन जिल्ह्य़ात पूराचे रुपांतर महापूरात होत आहे. 2005 साली आलेल्या भयानक महापुरावेळी पण ही चर्चा जोरात झाली होती. परत ही चर्चा थांबली. पण जरासा काळ गेला की परत हे दिसूनच येतेय की आलमट्टी धरणाच्या विसर्गाच्या नियोजनात वरील तीनही जिल्हय़ात पूर येणार की नाही हे ठरले जातेय.
कोयनेचा विसर्ग सुरू झाला की ते पाणी कृष्णा नदीत येते, किती वेळात येते किती वेळाने कुठे येते याची गणितीय माहिती शासनाकडे आहे. पुढे तेच पाणी पाऊसाच्या वाढीव पाण्यासहीत आलमट्टी कडे जाते. म्हणजेच एकूण पाण्याच्या प्रमाणाची कल्पना सर्वानाच असते.शिवाय प्रत्येक नदी पुलावर धोक्याची पातळी सांगणारी रेषा आखलेली असतेच. सांगलीत 55 फुटापर्यंत आहे. पण 49 फुटानंतर पाणी सांगली गावात घुसू लागते याची सर्वाना कल्पना आहे. पंचगंगा नदीबाबतीतही हेच गणित आहे. कारण हीच पंचगंगा पुढे कृष्णेला मिळते.
4 दिवसापूर्वी प्रथमतःच बहे पुल पूर्णपणे पाण्याखाली गेला जो 2005 साली ही पाण्याखाली गेला होता, त्याच वेळी एका तासामध्ये आवश्यक त्या सूचना देऊन घेऊन आलमट्टीचा विसर्ग वाढवायला पाहीजे होता. कारण एक-एक तास अशावेळेस महत्वाचा असतो. अशावेळी वाहत्या पाण्याला जास्त गती मिळणे आवश्यक असते.
कारण बहे पूल पाण्याखाली गेला म्हणजे ताकारी, भिलवडी तथा अन्य समान उंचीवरील पूल पूर्णपणे बुडतात, सांगलीतील पातळी 49 फूटाच्या वर जाते तेव्हा कृष्णेला मिळणाऱ्या पंचगंगा व इतर नद्यातील पाणी वाहण्याची गती पण मंदावते परिणामी पचगंगा काठावर पुरपरिस्थीती निर्माण होते. इतके सगळे गणितीय संदर्भ पहिल्यापासून उपलब्ध असताना सुद्धा योग्य ते नियोजन करायला सर्वच यंत्रणा अपयशी ठरली आहे. नियोजन करायला खूप उशिर होत आहे.
कृष्णेला महापूर आल्याने तिला मिळणाऱ्या पंचगंगेची वहाण्याची गती कमी होते आणि पंचगंगेलाही महापूर येऊन ज्यावेळी राष्ट्रीय महामार्ग पूर्ण बंद होतो त्यावेळी सांगली अर्धी पाण्याखाली जाते, अखंड गावेच्या गावे उद्ध्वस्त होतात तरीही आलमट्टीमधून विसर्ग वाढवला जात नाही?. तसे गणितीय आकडे आम्ही सामान्यांनी जास्त पहाण्याची गरजच नाही. एवढे नक्की कळते की आवश्यकता जास्त विसर्ग करण्याची असताना ही विसर्ग केला जात नाही.
आणि जणू काही जरा जास्त विसर्ग केला तर आलमट्टी धरणातील पाणीच संपणार होते? की पावसाळा संपणार होता ? एवढे सामान्य ज्ञान पण संबंधिताना असू नये का, याचे आश्चर्य वाटत आहे.
पुर याआधीपण येतच होता पण आताचा जो येतोय त्याची भयानकता पहाता त्यात कृत्रिमता पण आणली गेलीय असे वाटतेय. कारण सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्हा अप्रत्यक्ष रित्या सरळसरळ आलमट्टीच्या बॅकवॉटरचा भाग बनवून टाकला आहे हे सत्य आहे.
आलमट्टी धरणाच्या उंचीमुळे आता ज्या गतीने कृष्णा नदीतील पाणी वाहायला पाहीजे ती गती आता मिळणे कधीच शक्य नाही आणि सामान्य पूर परिस्थितीत जर कर्नाटकने विसर्गाचे नियोजन योग्य नाही केले की महापूराचीच परिस्थिती निर्माण होत रहाणार आहे.
कारण कृष्णेला मिळणाऱ्या सर्व नद्यांची सुद्धा वाहण्याची गती कमी होणार व त्यांची पण कृष्णेसारखीच अवस्था होत रहाणार. सर्व गणितीय शक्यतेंचा अभ्यास करुन आलमट्टी धरणासाठी नक्कीच नव्याने मापदंड आखायला पाहीजेत, अन्यथा छोट्या मोठ्या पुराचे सुद्धा वारंवार महापूरात रुपांतर होत राहणार यात शंका नाही..!
-डॉ कीर्तिराज
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.