केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलत जम्मू काश्मीर मधून ३७० कलम हटवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतींच्या आदेशानुसार हे कलम हटवण्यात येत आहे. सोबतच जम्मू काश्मीर राज्याची विभागणी करून जम्मू काश्मीर या विधानसभा असणाऱ्या केंद्रशासित प्रदेशाची आणि लडाख या विधानसभा नसणाऱ्या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली आहे. मागच्या ७० वर्षांपासून लडाखचे नागरिक केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळावा अशी मागणी करत होते. जाणून घेऊया या लडाख विषयी खास गोष्टी…
असा आहे लडाख
लडाख हा समुद्रसपाटीपासून ९८४२ मी. उंचावरील भारतातील अत्यंत सुंदर असा प्रदेश आहे. देशभरातील हजारो लोक दरवर्षी इथे येत असतात. या भागाला शीत वाळवंट असेही म्हणतात. खासकरून दुचाकीवर स्वार होऊन कित्येक युवक लडाखची सहल काढत असतात.
उत्तरेला काराकोरम पर्वतरांगा आणि दक्षिणेत हिमालय पर्वत या दरम्यान लडाख स्थित आहे. लडाखच्या उत्तरेला शेजारी देश चीन आणि पूर्वेला चीनच्या ताब्यातील तिबेटची सीमा आहे. लडाख हा सीमाभाग असल्याने सामरिकदृष्ट्या त्याचे अत्यंत महत्व आहे. लेह ही लडाखची राजधानी आहे.
लडाखची जीवनरेखा सिंधू नदी
सांस्कृतिकदृष्ट्या लडाख प्रदेश महत्वाचा आहे. सिंधू नदी इथली जीवनवाहिनी नदी असल्याने सिंधू संस्कृतीच्या पाऊलखुणा इथे आढळतात. भारतात सिंधू नदीचा प्रवाह केवळ लडाखमध्येच आढळतो. इथे अनेक जुने शिलालेख सापडतात, त्यावरून लडाख पाषाणकाळात स्थापन झालेला भाग असल्याचे दिसून येते.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानने हा प्रदेश बळकावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला इथून पिटाळून लावत सिंधू नदीच्या खोऱ्यातील हा भूप्रदेश आपल्या ताब्यात ठेवला.
अशी आहे लडाखची रचना
१९७९ पासून लडाखमध्ये लेह आणि कारगिल हे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले आहेत. लेहमध्ये बौद्ध आणि काश्मीरमध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत. एकेकाळी लडाख मध्य आशियासोयाबीत व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. प्राचीन काळात सिल्क रुटचा एक मार्ग लडाखमधूनच जात होता.
मध्य आशियातील देशांचे व्यापारी उंट, घोडे, खेचर, रेशमी आणि गालिचा यांचा व्यापार करण्यासाठी इथे येत आणि आपल्यासोबत भारतातील मसाल्याचे पदार्थ, रंग अशा वस्तू घेऊन जात. इथले निसर्गसौंदर्य बघण्यासारखे आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.